शेतात तातडीने सोलर पंप बसवा अन्यथा धरणे आंदोलन करणार शेतकरी कामगार पक्षाचा इशारा


शेतात तातडीने सोलर पंप बसवा अन्यथा धरणे आंदोलन करणार 

शेतकरी कामगार पक्षाचा इशारा 

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अग्रीम रक्कम शासनाकडे वेळेत भरणा करून सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्युत विभागाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसवून दिला नसल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा आटापिटा सहन करावा लागत असून विद्युत विभागाने तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसवून द्यावे अशी मागणी मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

आलापल्ली येथील विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्साची अग्रीम रक्कम ऑनलाईन पध्दतीने शासनाकडे भरणा केली. मात्र विद्युत विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसवून दिले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्युत विभागाच्या वतीने तातडीने सदरचे सोलर पंप बसवून दिले नाही तर आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लवकरच बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला. यावेळी हरिदास तोरे, साईनाथ सेडमाके, भुरू पेंदाम, रोशन मडावी, गुरुदास सेडमाके, आशिष पेंदाम व शेतकरी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने